वाचक लिहितात   

सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासावर गदा
 
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या बेस्टने आपल्या तिकीट दरात वाढ केली. बेस्टने ५ रु. वरून १० रू. १० रू वरून १५ रू. १५ रू वरून २० रू. आणि २० रू. वरून थेट ३५ रू. अशी दरवाढ केली आहे. बेस्टने केलेल्या या दरवाढीमुळे बेस्टने प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेस्टने प्रवास करणारे प्रवासी हे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. वाढत्या महागाईने आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे या दरवाढीने कंबरडेच मोडणार आहे. बेस्टच्या या दरवाढीनंतर ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली अशा परिवहन सेवाही आपल्या तिकिटदरात वाढ करण्याची शक्यता आहे, इतकेच नाही तर राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळ देखील आपल्या तिकीट दरात वाढ करू शकते. मेल एक्स्प्रेस गाड्यांमधील जनरलचे डब्बे कमी केले. या जनरल डब्यातून आणि साध्या लोकलमधून सर्वसामान्य, गरीब प्रवाशीच प्रवास करतात. एकूणच सर्वसामान्य, गरीब प्रवाशांच्या प्रवासावरच गदा आणली जात आहे. गरीब, सर्वसामान्य जनतेला सुविधा देण्याऐवजी श्रीमंत वर्गाला केंद्रस्थानी ठेवूनच हे होत आहे. गरीब, सर्वसामान्य वर्गाचा विचार येथील व्यवस्था करीत नाही, हेच यातून सिद्ध होते.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे.
 
स्त्री-पुरुष समानता ?
  
आपल्या देशात स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना केवळ कागदावर उरली आहे असे राष्ट्रीय महिला आयोगाला यावर्षी प्राप्त झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या ७६९८ तक्रारींवरून ते दिसून येते. आयोगाच्या आकडेवारीनुसार यामधील सर्वाधिक २० टक्के तक्रारी म्हणजे १५९४ या घरगुती हिंसाचाराशी संबंधित असून महिलांवरील हल्ले (९५० तक्रारी), गुन्हेगारी धमक्या (९८९), हुंड्यासाठी छळ (९१६), बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न (३९४), विनयभंग (३१०) आणि लैंगिक छळ (३०२) अशा तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी (३९२१) उत्तर प्रदेशातून आल्या असून त्यानंतर दिल्ली ६८८, महाराष्ट्र ४७३, मध्य प्रदेश ३५१ , बिहार ३४२ आणि हरयाना ३०६ यांचा क्रमांक लागतो. देशभरात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि स्वयंसेवी संस्था सर्वोतोपरी एकत्रित प्रयत्न करत असतानाही गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव राष्ट्रीय महिला आयोगाच्या या आकडेवारीवरुन समोर आले आहे. महिला अत्याचाराची ही आकडेवारी चिंता वाढवणारी असून देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई   
 
जलस्त्रोतांचे संवर्धन व्हावे
 
महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ म्हणजे अंबेजोगाईची श्री योगेश्वरी देवी. ही अनेक जणांची कुलदेवता असल्याने भक्तांची येथे नेहमी गर्दी असते. मंदिर परिसर बर्‍यापैकी स्वच्छ आहे. मंदिराच्या जवळ एक नदी सदृश्य पाण्याचा प्रवाह आहे. १/१० टक्के पाणी व उरलेल्या भागात रसायनाचा कापसाप्रमाणे पांढरा फेस आहे. त्याच्या दुर्गंधीने जवळून जात असताना जीव गुदमरतो. अंबेजोगाईसारख्या लहान गावातील नदीची ही अवस्था आहे. पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नद्या सुद्धा गटार स्वरूपच झाल्या आहेत. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, नदीवरील अतिक्रमण यामुळे नदी अरुंद, उथळ प्रदुषित होत चालली आहे. नदीचा उगम पर्वतावर होतो. आपल्या प्रवाहाबरोबर ती अनेक खनिजे, वनस्पतींचे औषधी गुणधर्म घेऊन येते, तसेच ती आपल्याबरोबर घाण कचरा वाहून नेते व परिसर स्वच्छ करते. नदी म्हणजे संस्कार, संस्कृती. आपल्याला जर स्वच्छ व भरपूर पाणी हवे असेल, तर सर्व नद्यांचे प्रदूषण थांबणे अत्यंत गरजेचे आहे. 
 
लीना गाडगीळ, पनवेल
 
उष्णतेचा कहर
 
भारताच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार मे महिन्यात देशाच्या अनेक विभागात तपमान सरासरीच्या अधिक असण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या संचालकांच्या मते उष्णतेच्या लाटांच्या दिवसाची संख्या सरासरीपेक्षा एक ते चार दिवस अधिक राहण्याची शक्यता आहे. राजस्तान, हरयाना, पंजाब, मध्य प्रदेशला उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगालमध्ये हे दिवस अधिक असतील. गुजरात, ओडिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटकातील काही भाग येथे सुद्धा उष्णतेच्या लाटेचे दिवस दरवर्षीपेक्षा जास्त असतील. यामुळे देशातील बहुतेक भागात सामान्य ते सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत व मध्य भारत येथे पावसाचे प्रमाण कमी राहील. देशात एप्रिल महिन्यात ७२ वेळा उष्णतेच्या लाटा अनुभवल्या. राजस्तान, गुजरातमध्ये ६ ते ११ दिवस सरासरीपेक्षा जास्त उष्णता होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल ही बातमी नुकतीच वाचली. हा हवामानाचा अंदाज मागणी वाढविण्याच्या दृष्टीने चांगला आहे. २०२६ मध्ये पिकांचे उत्पादन चांगले राहिले, तर त्याचा फायदा महागाई आटोक्यात राहील. 
 
शांताराम वाघ, पुणे

Related Articles